उल्हासनगरमध्ये इमारत दुर्घटनेचे सत्र सुरूच, ५ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू

उल्हासनगर/प्रतिनिधी – उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा भीषण इमारत दुर्घटना झाली आहे. एका 5 मजली इमारतीचे स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. उल्हासनगरच्या 2 नंबरमधील नेहरू चौकात बँक ऑफ बडोदासमोर ही साई सिद्धी नावाची इमारत आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देत बचाव आणि मदतकार्याची पाहणी केली.

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ठाणे महापालिकेची डिझास्टर रेस्क्यू फोर्सची टीमही घटनास्थळी दाखल झाली. या ठिकाणी शोधकार्य सुरू असून आत्तापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

दरम्यान १५ मे रोजीही उल्हासनगरमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. उल्हासनगर शहरातील कॅम्प एक भागात असलेल्या मोहिनी पॅलेस या 4 मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब कोसळून 5 जणांना जीव गमवावा लागला होता. त्याला अवघे काही दिवसही उलटत नाहीत तोच काल आणखी एक दुर्घटना घडल्याने इथल्या इमारतींच्या सुरक्षेचा आणि नागिरकांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web