कल्याण/प्रतिनिधी – कल्याण शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या नवीन दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. येत्या ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन या मार्गिकेचे लोकार्पण होणार असून येथून वाहतूक सुरू झाल्यावर नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन त्यांना दिलासा मिळणार असल्याचं मत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलं आहे.
आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज नवीन दुर्गाडी पुलाच्या बांधकामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकारी वर्गाला सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्यासोबत एमएमआरडीएचे अधिकारी वर्ग,वाहतूक पोलिस अधिकारी हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत आमदारांनी उदघाटन कार्यक्रमाचे नियोजन तसेच त्यांनतर करण्यात येणारे वाहतुकीचे नियोजन यांबद्दल चर्चा करून काही महत्वाच्या सूचनाही केल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक याची वाट बघत होते. मी स्वतः याचा वारंवार पाठपुरावा करीतच होतो तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही सातत्याने येथील कामावर लक्ष होते. आता मात्र नवीन पुलाच्या एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू झाल्याने शहरातील वाहतूकीची समस्या बऱ्याच अंशी कमी होईल असा विश्वासही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.३१ मे रोजी सांयकाळी ५ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे हे ऑनलाइन प्रणाली द्वारे मार्गिकेचे उदघाटन करतील तर पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शहरातील समस्त लोकप्रतिनिधी नवीन दुर्गाडी पुलाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.