कल्याण/प्रतिनिधी -२५ मे २०२० पासून शून्य कचरा मोहीम राबविण्यास प्रारंभ केल्यानंतर आता २५ मे २०२१ रोजी वर्षापूर्तीअंती डम्पिंग ग्राउंड वर कचरा टाकणे बंद केल्यानंतर आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डम्पिंग ग्राउंड परिसराची घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासमवेत पहाणी केली. या डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याचे बायोमायनिंग करून सपाटीकरण केले जाईल आणि या जागेवर अतिशय सुंदर असे उद्यान, सायकल ट्रॅक व जॉगिंग ट्रॅकची उभारणी केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
बिल्डींग परमिशन देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अटी त्यामध्ये अंतर्भूत असतात,परंतु या अटी पालन न केल्यास संबंधित विकासकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,असेही ते पुढे म्हणाले. आता यापुढे आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद केल्यामुळे उंबर्डे आणि बारावे येथे कचरा प्रक्रिया करण्यात येईल. यापूर्वी कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थित होत नव्हते, आता ओला कचरा हा आता बायोगॅस व कंपोस्टिंग साठी पाठवला जातो आणि सुका कचरा उचलण्यासाठी या एजन्सी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांचेकडून महानगरपालिकला रॉयल्टी देखील मिळते अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.