कल्याण/प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया तब्बल एक महिन्यानंतर सुरु झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्याकरीता तयार करण्यात आलेली सरकारची साईट सारखी हँग होत आहे. त्यामुळे मदत खात्यात जमा होण्यासाठी रिक्षा चालकांना मनस्तापच सहन करावा लागतो.
राज्यात १५ एप्रिल रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजी बंद असली तरी रोटी बंद होणार नाही. रिक्षा चालकांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात येतील अशी घोषणा केली होती. १५ एप्रिलच्या आधी सरकारने केलेल्या घोषणोनुसार पैसे रिक्षा चालकांच्या खात्यात जमा होण्याची सरकारी प्रक्रिया सुरुच झाली नाही. त्यासाठी ऑनलाईन साईट तयार करण्याकरीता एक महिना वाया गेला. आत्ता साईट तयार झाल्यावर कालपासून रिक्षा चालकांनी मदतीसाठी कागदपत्रंसह नोंदणी सुरु केली आहे. काल पासून ही साईट हँग होत आहे. आज सकाळी दोन तास साईट हँग होती. तांत्रिक कारणामुळे ही साईट हँग होते. त्याचा मनस्ताप रिक्षा चालकांना सहन करावा लागत आहे.
राज्यभरातून रिक्षा चालक एकाच वेळी ऑनलाईन कागदपत्रे सादर करीत असल्याने ही साईट हँग होते. मात्र साईट हॅँग होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे कल्याणचे पदाधिकारी यांनी केली आहे. राज्यभरात १५०० रुपये मदतीचे रिक्षा चालक लाभाथ्र्याची संख्या जवळपास ८ लाख १२ हजार आहे. त्यापैकी कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रतील रिक्षा चालक लाभाथ्र्याची संख्या ६० हजार आहे. आत्तार्पयत केवळ ७० रिक्षा चालकांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे सरकारची हि मदत मिळणार तरी कधी असा संतप्त सवाल रिक्षाचालक करीत आहेत.