तोक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान,अनेक ठिकाणी झाडे उन्‍मळून पडली

रत्नागिरी/प्रतिनिधी – कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तोक्ते चक्रीवादळाच्या गतीत बदल झाल्याने त्याचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सर्व गावांना बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे.

आज दुपारी साधारण 12 च्या सुमारास सदर वादळाच्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्याच्या स्थितीनंतर वाऱ्याचा वेग ताशी 130 मैलापर्यंत वाढल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उमळून पडणे, वीजेचे खांब व तारा तुटुन विद्युत पुरवठा खंडीत होणे असे प्रकार घडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार  रत्नागिरी व राजापूर तालुक्यात काही घरांची पडझड झाली आहे. तथापि जीवित हानीचे वृत्त नाही.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करण्यात आलेल्या  नियोजनामुळे राजापूर तालुक्यात कच्च्या घरात राहणाऱ्या 652 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. सांयकाळी 05 वा. च्या सुमारास वाऱ्याचा वेग 120 किमी प्रती तास वाढण्याचा अंदाज बघून तत्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम प्रशासनाने केले. रत्नागिरी शहर, राजापूर तालुका, साखरीनाटे, आंबोळगड, मुंबई-गोवा महामार्ग तसेच किनाऱ्यालगतच्या गावात मोठ्या प्रमाणावर पोफळी, नारळाची झाडे पडली. या चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web