कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला सिव्हिल रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी मनसेने केली असून याबाबत मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे संचालित बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दरवर्षी हजारों रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घ्यायला येतात. पण योग्य वेळी योग्य आरोग्य सेवा उपलब्ध नसल्या कारणाने रुग्णाला मुंबईच्या रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात भटकंती करायला लागते. औषधांचा तुटवडा, आरोग्य अधिकाऱ्याची कमतरता आणि रुग्णाकडे दुर्लक्ष हि नेहमीची बाब आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राची लोकसंख्या आणि नजीकच्या दुसऱ्या उपनगरांची लोकसंख्या आणि येणाऱ्या रुग्णाची संख्या लक्षात घेता, कल्याण शहरात एक सिव्हिल रुग्णालयाची गरज भासत आहे.
राज्य सरकारला याबाबत पाठपुरावा करून देखील राज्य सरकार याकडे लक्ष देत नसल्याने केंद्र सरकारने या बाबतीत लक्ष देउन बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला सिव्हिल रुग्णालयाचा दर्जा दिला तर नागरिकांना सोयीस्कर होईल. या रुग्णालयाची इमारत दर्जेदार असून येथे सर्व सुविधा संपन्न सिव्हिल रुग्णालय होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत योग्य लक्ष देऊन योग्य कार्यवाही करण्याची मागणी मनसेच्या रुपेश भोईर यांनी केली आहे.