कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांचा कामबंद करण्याचा इशारा,अस्थायी कामगाराची ठेकेदाराकडून पिळवणूक

कल्याण/ प्रतिनिधी – गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत कमी पगार देण्यात येत असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी देखील घेत नसल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद करण्याचा इशारा दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध कोविड सेंटर मध्ये हजारो नागरिकांची सेवा डॉक्टरांसोबतच सफाई कर्मचारी करत आहेत. टाटा आमंत्रा, आर्टगॅलरी, डोंबिवली जिमखाना या कोविड सेंटरमधील शार्प कंपनीच्या अंर्तगत शेकडो महिला व पुरुष सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी कोविड काळात १२ हजार रुपये वेतन होते. असे असतांना संबंधित ठेकेदाराकडून तीन हजारांची कपात करून यावर्षी केवळ ९ हजार रुपये वेतन देण्यात येत आहे.

त्याचबरोबर या जीवघेण्या आजाराला सामोरे जाताना या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील वाऱ्यावर सोडला असून त्यांना कोणताही इन्शुरन्स नाही, कोणत्याही सुरक्षेची काळजी नाही. त्यांना देण्यात येणारे सुरक्षा किट अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, मास्क व हॅण्डगलोज सारख्या सुरक्षा कवच संबंधित शार्प सर्विसेस कंपनीकडून मिळत नाही. त्याचबरोबर आरोग्य तपासणी नाही, साप्ताहिक सुट्टी,कामावरून काढण्याची धमकी अशा अनेक मुद्यांवर कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

 आपले तसेच आपल्या कुटुंबाचे जीव धोक्यात घालून  हे कर्मचारी काम करत असून त्यांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. आपल्या या मागण्यांसंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त, डॉ. विजय सूर्यवंशी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून आपल्या मागण्या मान्य न झाल्यास या कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता संबंधित ठेकेदाराला या सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार किमान वेतन देण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web