कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आता किरकोळ विक्रीस मनाई

कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आता किरकोळ विक्रीस मनाई करण्यात आली आहे.

कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज भाजीपाल्याची विविध वाहने राज्यातील विविध भागातून दररोज भाजीपाला, फळे ,पालेभाज्या  घेऊन येतात. सदर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रकारचा भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे ही अत्यावश्यक झाले आहे. याकरिता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व प्रकारचा शेतमाल भाजीपाल्याच्या वाहनांना फक्त घाऊक विक्री साठी येण्यास परवानगी देण्यात येत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किरकोळ विक्रीस प्रतिबंध करण्यात येत असून किरकोळ खरेदीदारांना यापुढे थेट खरेदी साठी प्रतिबंध करण्यात येत आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येण्या जाण्याच्या मार्गावर तसेच सामायिक जागेत येणाऱ्या वाहनांच्या वाहन चालक व कर्मचाऱ्यांसाठी थर्मल स्क्रीनिंग व हँडवॉशची व्यवस्था करणे, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, दर रविवारी बाजार बंद ठेवणे तसेच आठवड्यातून दोन वेळा समितीच्या आवाराचे  निर्जंतुक करणे याची संपूर्ण जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची राहील. या अटी शर्तींची उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात येईल, असा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web