कल्याणमध्ये विकेंड लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद

कल्याण प्रतिनिधी – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाने विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. कल्याणमध्ये देखील महानगरपालिकेच्या वतीने कडक निर्बंध लागू केले असून आजच्या विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

किराणा, भाजीपाला, चिकनशॉप वगळता सर्व दुकाने बंद होती. तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि विविध चौका चौकात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर आणि रिक्षाचालक, वाहनांवर पोलिसांच्या वतीने कारवाई देखील करण्यात येत होती. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा नसल्याने रिक्षास्टॅण्ड रिकामे होते. तर बाजारपेठेत देखील सर्व दुकाने बंद असल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. लॉकडाऊन असल्याने रस्ते मोकळे असल्याचा फायदा घेत महानगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दलाच्या सहकार्याने विविध ठिकाणी जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार, स्टेशन परिसर, प्रेम ऑटो, गांधारी ब्रिज आदी ठिकाणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करून वाहनांची तपासणी केली. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या आणि नियम मोडणारयांवर कारवाई करण्यात आली. कलम २०७ प्रमाणे १८ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार दंड वसूल करण्यात आला. तर कलम १७९ प्रमाणे ५९ वाहनांवर कारवाई करत प्रत्येक वाहनाकडून ५०० रुपये दंड आकरण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web