सोलापूर प्रतिनिधी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक नागरिकाला रेशन कार्ड युनिट प्रमाणे दोन हजार रुपये रोजगार भत्ता द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पीपल्स फ्रंट चे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय आवारे यांनी निवेदनाद्वारे केली. याबाबतचे निवेदन मोहोळ तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरा पासून कोविड १९ मुळे संपूर्ण देशवासीयांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरीक व हातावरचे पोट असणाऱ्या गरीबांचा रोजगार थांबला आहे. घरातील कर्ता पुरुष कामासाठी बाहेर नाही पडला तर घरखर्चासाठी पैशा अभावी अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
कोरोना प्रतिबंधक लस देऊन शासन एकीकडे नागरिकांचा जीव वाचवत आहे तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांचा रोजगार हिसकावून घेत त्यांचा जीव घेण्याचे काम करत आहेत. ही महामारी कधी आटोक्यात येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे शासनाने हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब व सामान्य नागरिकांना रेशन कार्डच्या युनिट प्रमाणे दरमहा दोन हजार रुपये रोजगार भत्ता दिला पाहिजे. जेणेकरून सर्वसामान्य नागरीक घरातून बाहेर पडणार नाहीत. व वाढणारा करोना रोखण्यास मदत होईल, अशा आशयाचे निवेदन मोहोळ तहसीलदारांमार्फत धनंजय आवारे यांनी प्रशासनाला दिले आहे.
या निवेदन रिपब्लिकन पीपल्स फ्रंट महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय आवारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा देशपांडे, हारून शेख, विजय सुतकर, विकास देशपांडे, अल्ताफ शेख इत्यादींनी दिले