कल्याण प्रतिनिधी –शाळा आमुची सुटली रे या व्हिडीओ गीताने निश्चितच रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम माहिती होऊन अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचे उत्कृष्ट मार्गदर्शन या व्हिडिओ गीतामध्ये केलेले आहे. सामाजिक बांधिलकीतून केलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी शाळा आमुची सुटली रे या म्युझिकल व्हिडीओचं उद्घाटन कारतांना काढले. लक्ष्मी चित्र निर्मिती व अजय पाटील संकल्पित, दिग्दर्शित शाळा आमुची सुटली रे या व्हिडिओ गीताचे नुकताच ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.
या वेळी संगीतकार, गायक, ढोलकी वादक संजय अस्वले, हार्मोनियम वादक शरद जाधव, खंजेरी वादक विनोद निंबाळकर, टाळ तालवादक राजेंद्र पाटील, कलाकार भानुदास केदार, सोनाळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, दिग्दर्शक अजय पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांनी या व्हिडीओ गीतातून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम समजावून सांगण्याचा छान उपक्रम केला आहे. असेही प्रतिपादन केले.
या व्हिडीओ गीताने रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही या व्हिडिओ गीताची निर्मिती केलेली आहे असे दिग्दर्शक अजय पाटील यांनी सांगितले. या गीताला संगीत देताना शालेय विद्यार्थ्यांसाठी हे गीत करत असून त्यांनी आनंद घेत संदेश ग्रहण करावा अशाच उद्देशाने संगीत दिले आहे असे संजय अस्वले यांनी सांगितले.
लक्ष्मी चित्र या यूट्यूब चँनलवर हे गीत रिलीज केले आहे. सकारात्मक संदेश देणारा हा व्हिडीओत कलाकार म्हणून काम करणारे सर्वच विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा सोनाळे येथील आहेत. या गीताचे रेकॉर्डिंग डुंगे शाळेत केले आहे. गीताला कोरस देणारे सर्व विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळा डुंगे येथील आहेत. हार्मोनियम वादन शरद जाधव, खंजेरी वादन विनोद निंबाळकर, टाळ वादन राजेंद्र पाटील, छायाचित्रण वल्लभ केणे, एडिटिंग आकाश पाटील निर्माती अजिता पाटील यांनी केली आहे.