कल्याण प्रतिनिधी-उल्हासनदी बचाव कृती समिती तर्फे रविवारी पाचवा मैल येथे निषेध होळी करण्यात आली.उल्हास नदीच्या प्रदुषणासाठी जवाबदार असणाऱ्या प्रदूषण कर्त्यांचा, निष्क्रिय अधिकाऱ्यांचा, मोठं मोठे नाले नदीत सोडलेल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा, जलपर्णीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांच्या निर्मात्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच नदी प्रदुषणाचे फोटो आणि नदीतील जलपर्णी देखील या होळीत लावण्यात आली होती.
वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नदी स्वच्छते बाबतीत उदासीन असणारे सरकार आतातरी नदी साठी काही ठोस भूमिका घेऊन नदी स्वच्छतेचे मार्ग मोकळे करेल आणी भविष्यात पुढच्या पिढीसाठी उल्हासनदी स्वच्छ सुंदर मिळेल अशी आशा यावेळी उल्हासनदी बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाजूलाच असलेली वालधुनी जशी केमिकलच्या विळख्यात सापडली आहे तशी परिस्थिती या उल्हास नदीची होऊ नये म्हणून उल्हासनदी बचाव कृती समिती स्वतः प्रत्येक रविवारी वेगवेगळे उपक्रम, श्रमदान, जनजागृती अशी अनेक कामे अगदी स्थानिक पातळीवर जाऊन करत असते.
संबंधित खात्याने लक्ष देत कायम स्वरूपी उपाययोजना करत नाही तोपर्यत अशी अनेक निषेधात्मक आंदोलने होत राहणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले. यामध्ये उल्हासनदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईर, निकेत व्यवहारे, निकेश पावशे, प्रशांत शेंडगे, भूषण लोखंडे, सागर लोखंडे, अनिरुद्ध भालेराव, निखील अंबावणे, ऋषिकेश गायकवाड, सचिन शिंगे, महादेव बंदीचोडे व स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.