कल्याण प्रतिनिधी – आंबिवली येथील NRC ही कंपनी गेल्या १२ वर्षांपासून बंद असून सुमारे तीन हजार कामगारांना अद्यापही त्यांची देणी देण्यात आलेली नाही. शिवाय कामगारांना कंपनीकडून देण्यात आलेली राहती घरे आता काढून घेण्यात येत असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गेल्या १९ दिवसांपासून हजारो कामगार NRC कंपनी समोर धरणे आंदोलन करीत आहे. काही दिवसांपूर्वी NRC कामगारांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली व त्यांना निवेदन देऊन आंदोलनस्थळी भेट देण्याची आग्रही विनंती केली होती. त्यानुसार बाळासाहेब आंबेडकर हे उद्या दिनांक ४ मार्च रोजी दुपारी एक वाजता आंबिवली येथील NRC कंपनीच्या कामगारांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.