कल्याण प्रतिनिधी– ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची कल्याण येथील जलतरणपटू श्रावणी संतोष जाधव हिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी. सागरी अंतर ३ तास ४३ मिनिटात पोहून पूर्ण केले. कल्याणची सागर कन्या म्हणून ओळख असणारी श्रावणी जाधव हिने पोहून हे अंतर पार केले असून दोन वर्षांपूर्वी जागतिक विक्रम करणारी कल्याणची डॉली पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवत श्रावणी हिने मोठी मजल मारली आहे.
श्रावणी हिने हे अंतर पार केल्यानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर व स्थायी समिती सदस्या नगरसेविका सुजाता सानप आणि स्विमिंग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे किशोर शेट्टी व संतोष पाटील उपस्तित होते. रुपाली रेपाळे यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.
दरम्यान शिवसेना महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांनी कल्याणमध्ये श्रावणी हिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. तसेच तिने केलेल्या या विक्रमाचे कौतुक देखील केले. श्रावणीमुळे कल्याणचे नाव आणखी उंच झाले असून श्रावणीने अशाचप्रकारे अनेक विक्रम करण्याच्या शुभेच्छा पोटे यांनी तिला दिल्या.