कल्याण प्रतिनिधी– रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष संघटना च्या वतीने छत्रपती शिक्षण मंडळाच्या गैरव्यवहारा विरोधात अभिनव प्राथमिक विद्यामंदिर टिळक चौक कल्याण येथे आर पी आय महिला ठाणे जिल्हाध्यक्षा अपेक्षा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन घेण्यात आले.
छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेतील शिक्षक नियुक्ती मधील गैरव्यवहार व हुकूमशाही कारभारा संदर्भातील विविध अशा १४ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान संस्थेच्या चिटणीस मीनाक्षी गागरे आणि भारती वेदपाठक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन एका मागणीसंदर्भात लेखी पत्र देण्याचा प्रयत्न केला. त्यावर आंदोलनकर्त्यांनी आमच्या सर्व १४ मागण्यांबाबत काय कारवाई करणार याचे लेखी उत्तर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ठणकावले. अखेरीस संस्थेच्या वतीने येत्या दहा ते बारा दिवसांत कारवाई करण्याचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपसचिव मामा गायकवाड, डी बी एन संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद वानखेडे, कल्याण-डोंबिवली महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.