महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा

नवी दिल्ली प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक  महोत्सवी वर्ष आहे. गेल्या ६० वर्षात  महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये केलेली  प्रगती उल्लेखनीय आहे, याचेच औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र   शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्र आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या श्रृखंलेमध्ये महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत परिचय केंद्राने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा’ आयोजनाचा अभिनव  उपक्रम आखला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देश-विदेशात वास्तव्यास असणाऱ्या  व मराठी भाषा अवगत असणाऱ्या  व्यक्तींनी या उपक्रमात मोठया संख्येने सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन परिचय केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

 हीरक ’ महोत्सव महाराष्ट्राचा 

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे  हीरक  महोत्सवी वर्ष सुरु आहे. स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व करणाऱ्या  महाराष्ट्राने समाजप्रबोधन आणि सामाजिक विकासात केलेले कार्य देशातील अन्य राज्यांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील धुरिणांनी  राज्याच्या विकासाचे स्वप्न बाळगून त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी अविरत कष्ट उपसले. सध्या  महाराष्ट्र हे देशात उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य असून देशातील सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक राज्यात झाली आहे . देशातील  सर्वात चांगल्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. राज्यातील सिंचन प्रकल्पांनी शेती विकासाला गती दिली आहे. सहकार चळवळीने राज्याच्या ग्रामीण भागाचे चित्र पालटले आहे. वंचित उपेक्षित घटकांबरोबर महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  महाराष्ट्राने अनेक कल्याणकारी  योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. महाराष्ट्राने देशाला ‘रोजगार हमी योजना’, ‘माहितीचा अधिकार’ सारखे प्रभावी कार्यक्रम दिले. राज्याने उद्योग,सहकार,ऊर्जा,शिक्षण,पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात अद्वितीय कार्य केले  जे इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

महाराष्ट्राची हीच गौरवशाली पंरपरा महाराष्ट्र गौरव गीतामध्ये प्रतिबिंबित व्हावी या उद्देशाने परिचय केंद्राने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी

  • 18 वर्षांवरील मराठी भाषा अवगत असणाऱ्या सर्व नागरिकांस ही स्पर्धा खुली राहील.

        2) महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेसाठी स्पर्धकाला एक व जास्तीत-जास्त दोन स्वरचित गीत पाठवता येतील.

3) महाराष्ट्र गौरव गीत पाठविणाऱ्या  स्पर्धकाने त्यांचे गीत ही स्वत:चीच रचना असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र परिचय केंद्रास देणे आवश्यक आहे.

4)  पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संमतीपत्रही सोबत जोडणे आवश्यक आहे.

5)  पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी परिचय केंद्रातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल.

निवड समितीने घेतलेला निर्णय स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

खालील पत्त्यावर पाठवा गीत  

या स्पर्धेसाठी  १० एप्रिल २०२१ पर्यंत गीत पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  स्पर्धकाने प्रतिज्ञापत्र आणि संमती पत्रासह आपली गीत रचना महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-8,स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडकसिंह मार्ग, नवी दिल्ली-11001.’ या कार्यालयीन पत्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमध्ये टपालाद्वारे पाठवावे. संबंधित रचना, प्रतिज्ञापत्र व संमतीपत्राची एक प्रत माहितीसाठी आमच्या कार्यालयीन ईमेल ‍micnewdelhi@gmail.comवरही पाठवावी.

परीक्षक मंडळ व पुरस्काराविषयी 

या स्पर्धेसाठी प्राप्त गीत रचनेची निवड ही या कार्यालयाद्वारे नेमण्यात आलेल्या साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. स्पर्धेत पहिल्या तीन रचनांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल 1 मे 2021 या महाराष्ट्र दिनी जाहीर कण्यात येईल. पहिल्या तीन उत्तम गीत रचनांना रोख रक्कम व प्रशस्तिपत्र स्वरुपात पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web