प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील पाच बालकांची निवड

प्रतिनिधी.

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन,अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ अग्रवाल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज या बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  देशातील  32 बालकांची   ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  २०२१’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील नांदेड येथील कामेश्वर वाघमारे (14), मुंबई येथील काम्या कार्तिकेयन (13), जळगाव येथील अर्चित पाटील(14), पुणे येथील सोनित सिसोलेकर(13) आणि नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल(16) या बालकांचा समावेश आहे.  पदक, 1 लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नांदेड येथील कामेश्वर  वाघमारे याची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासठी निवड झाली. मनार नदित पोहायला गेले असता बुडणाऱ्या दोन मुलांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने त्यांचा जीव वाचविला आहे.

मुंबई येथील काम्या कार्तिकेयन हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली. 13 वर्षीय पर्वतारोही काम्या कार्तिकेयन ही मिशन साहस या विशेष मोहिमेंतर्गत काश्मिर मध्ये विशेष प्रशिक्षण घेत असून तिला एक्सप्लूरस ग्रँडस्लॅम सर करून जगातील सर्वात कमी वयाची पर्वतारोही म्हणून देशाचे नाव उंचवायचे आहे.

अर्चित पाटील याची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. साधारण यंत्रांचा उपयोग करून अर्चित याने तयार केलेल्या उपकरणाद्वारे बाळंतपणात होणाऱ्या रक्तस्त्रावाची अचूक माहिती जाणून घेता येते.

पुणे येथील सोनित सिसोलीकर याची ज्ञानार्जन श्रेणीत निवड झाली असून  त्याने रेडिओलॉजीच्या प्रभावी परिणामावर संशोधनात्मक अभ्यास केला आहे. नासा या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही त्याच्या कार्याचा गौरव केला आहे.

नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल याची नवसंशोधन श्रेणीत निवड झाली आहे. श्रीनभ याने‍ पिकांवर येणाऱ्या यलो मोझॅक विषाणूला नष्ट करण्यासाठी कंबरमोडी या वनस्पतीच्या पानांपासून प्रभावी औषध तयार केली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web