प्रतिनिधी.
कल्याण – महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई नियमितपणे सुरू आहे. यात रहिवासी सोसायट्यांकडून पॅसेज व पाणीपंपासाठी मिटरशिवाय वीज वापरण्यात येत असल्याचे प्रामुख्याने निदर्शनास आले आहे. रहिवासी सोसायट्यांनी पाणीपंप आणि पॅसेजसाठी स्वतंत्र विजजोडणी घेऊन वीजवापर करावा अन्यथा संबंधितांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.कोरोना महामारीत पैसे वाचविण्यासाठी काही नागरिकांच्या अंगलट आला आहे .
कल्याण पूर्व उपविभाग एक अंतर्गत अडवली-ढोकळी भागात गेल्या दोन महिन्यांपासून वीज चोरट्यांविरुद्ध सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत २८० वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या चोरट्यांकडून सुमारे दोन लाख ६० हजार युनिटची जवळपास २८ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. चोरीच्या विजेचे देयक व दंडाचा भरणा करण्याबाबत संबंधितांना नोटीसा देण्यात आल्या असून या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येत आहे. या मोहिमेत १५ सोसायट्यांकडून पाणीपंप व पॅसेजसाठी विजेचा चोरटा वापर होत असल्याचे आढळून आले आहे.
अडवली-ढोकळी भागातील वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, आपले घरगुती व सोसायट्यांच्या पाणीपंप तसेच पॅसेजसाठीचे वीज मीटर बसविले असल्याची व या मीटरचे रीडिंगनुसार वीजबिल येत असल्याची खात्री करावी. वीजबिलाची रक्कम अधिकृत भरणा केंद्र अथवा महावितरणच्या ऑनलाइन सुविधेद्वारे भरावी. तसेच परवानाधारक कंत्राटदार अथवा व्यक्तीकडून वायरिंगचे काम करून घ्यावे.
मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, सहाय्यक अभियंते रोशन तिरपुडे, नितीन दुपारे, गजानन गवळी, निखिल शिंदे, कनिष्ठ अभियंते सूर्यकांत वाघमारे, देवेन्द्र पाटोळे तसेच उपविभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम सुरू आहे.