भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल

प्रतिनिधी.

भिवंडी – मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत. मनपात राष्ट्रवादीचे संख्याबळ नसतांनाही काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने राष्ट्रवादीची शहरातील ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी कोणार्क विकास व भाजपशी हात मिळवणी केल्याने अवघ्या ४ नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे महापौर पद आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. हि कारवाई टाळण्यासाठीच या १८ नाग्रसेवकांपैकीच १६ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.            एकंदरीतच एकहाती सत्ता असूनही काँग्रेसला भिवंडी महापालिकेत सत्तेपासून वंचित राहण्याची वेळ आली असून आता काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली या १६ नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्या खा सुप्रिया सुळे , उपमुख्यमंत्री अजित पवार , नेते छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.             दरम्यान राष्ट्रवादीचे नेते डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली १६ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून २ नगरसेवक बाहेरगावी असल्याने आज त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही लवकरच त्या दोघांचाही पक्ष प्रवेश राष्ट्रवादीत होणार असून या पक्ष प्रवेशाने आपल्या प्रयत्नांना निश्चितच यश आले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारुकी यांनी दिली आहे. तर जावेद फारुकी यांच्या प्रतिक्रियेला राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र मंत्री  आव्हाड यांच्या नेतृत्वाखालीच या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी दिली आहे. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web