पिकांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी सरकारला आली उशीरा जाग, हे वराती मागून घोडे नेमके कशासाठी?

प्रतिनिधी.

औरंगाबाद – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३६ लाख शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती सोबत दोन हात करीत असलेला शेतकरी सरकारी मदतीकडे आस लावून बसला आहे. मात्र जून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेले पिकांचे नुकसान बघण्यासाठी केंद्र सरकारला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जाग आली आहे. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पीक काढून टाकले आहेत तसेच पुढील पेरणीसाठी मशागतीचे काम सुरू केले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय पथक नेमकं कशाची पाहणी करण्याकरिता आले आहे. हे वराती मागून घोडे नेमके कशासाठी? शेतात पिकं उभी असताना झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक का आले नाही? राज्यातील खासदारांनी केंद्राकडे यासंदर्भात पाठपुरावा का केला नाही? मोठ्या उद्योगांच्या संदर्भात मध्यस्तीने मार्ग काढणारे आणि केंद्रात कृषिमंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा करून वेळेत पाहणी पथक का बोलावले नाही? राज्यातील भाजपचे नेत्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून वेळेत पाहणी पथक का बोलावले नाही? केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो कुणालाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीयेत. केवळ त्यांच्या प्रश्नावर राजकारण करून मतांचा जोगवा मागण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष करीत आहेत. आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येकडे लोटण्याचं पाप सरकार करीत आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या दोन्ही सरकारांचा निषेध करीत असून केंद्र सरकारने तातडीने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करावे अशी मागणी करीत आहोत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web