प्रतिनिधी.
डोंबिवली – दरवर्षी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमूळे टीकेचा भडिमार आणि नागरिकांकडून शिव्यांची लाखोली खाऊनही केडीएमसी काही सुधरण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. आधीच कल्याण डोंबिवलीत सर्वत्र कोरोनाची दहशत असताना नागरिक आता रस्त्यावर पडलेले खड्डे लोकांच्या जीवावर उठले आहेत. खड्ड्यांमूळे गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवली मध्ये ३ जण जबर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे केडीएमसी दरवर्षी चर्चेतही असते. आणि लोकांच्या प्रचंड रोषाची, संतापाची धनीही होते. दरवर्षी पावसाळ्यानंतर खड्डे आणि त्यामूळे होणाऱ्या अपघाताच्या घटना घडतात. 3 वर्षांपूर्वी तर कल्याण डोंबिवलीमध्ये खड्डयांनी ५ जणांचा जीव घेतला. एवढं सगळं होऊनही केडीएमसीतील सत्ताधारी आणि प्रशासन काही सुधरण्याचे नाव घेत नाहीत. खड्डे भरण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींची कंत्राटं काढली जातात. ज्यातून खड्डे भरण्यापेक्षा संबंधितांचे खिसेच भरले जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्याचे उत्तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून आपसूकच मिळून जाते. यावर्षीही अशीच कोट्यवधींची कंत्राटं निघालीत पण रस्त्यावरचे खड्डे काही भरले गेलेले नाहीत. परिणामी दिवसभरात कल्यान डोंबिवलीत झालेल्या 3 वेगवेगळ्या अपघातात 3 जण जबर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आणखी किती जण जखमी झाल्यावर, आणखी किती जणांचे आणि कोणाचे बळी गेल्यानंतर हा सर्व खेळ थांबेल? आधीच कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक, कौटुंबिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत केडीएमसीचा हा निष्काळजीपणा म्हणजे लोकांना आगीतून फुफाट्यात ढकलण्याच्या प्रकरा सारखा आहे.