भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

प्रतिनिधी.

ठाणे – भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी  ही  तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री श्री. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून श्री. शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web