मिशन बिगिन अगेन अंतर्गत ८ जुलै पासून राज्यातील हॉटेल्स, लॉज सुरु

प्रतिनिधी.

मुंबई – राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथीगृहांना 8 जुलै पासून क्षमतेच्या 33 टक्के सेवा देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत या व्यवसायांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्ती सह सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल असोसिएशन समवेत नुकतीच बैठक झाली होती. त्यात हे व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल असे मुख्यमंत्रानी सांगितले होते. यानुसार हे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नियमांचे पालन आवश्यक

हॉटेलच्या दर्शनी भागात कोविड संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शिका या विषयी माहिती देणारे फलक असणे आवश्यक आहे त्याबरोबरच गर्दी टाळण्यासाठी आणि वाहनतळासाठी योग्य व्यवस्था आवश्यक आहे. सामाजिक अंतर राखले जावे अशी बैठक व्यवस्था सुनिश्चित करणे बंधनकारक आहे. थर्मल स्क्रिनिंग करण्याबरोबरच स्वागत कक्षाला संरक्षक काच असणे आवश्यक आहे. सर्वांसाठी सहज निर्जंतुकीकरण द्रव्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांसह अतिथींना मास्क, हातमौजे इत्यादी साहित्य्‍ा उपलब्ध करणे आवश्यक आहे. पैशाच्या देवाणघेवाणीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे. उद्‌वाहन (लिफ्ट) मधील संख्याही  नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच वातानुकुलित यंत्रणेसंदर्भात वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तापमान 24 ते 30 डिग्री अंश सेल्सीअस आणि आर्द्रता 40 ते 70 टक्के असावी.

हॉटेलमध्ये केवळ लक्षणे नसलेल्या अतिथींनाच प्रवेश देण्यात यावा, त्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आपले प्रवास तपशिल, आरोग्य विषयक माहिती आणि ओळखपत्र देणे आवश्यक आहे. हॉटेलच्या खोल्या स्वच्छ निर्जंतुकरण केलेल्या असणे आवश्यक आहे. प्रत्येक अतिथी गेल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा होणे आवश्यक आहे. एखादा अतिथी आजारी किंवा लक्षणाचा दिसल्यास त्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे.

याबाबतचे आदेश आज दि.6 जुलै, 2020 रोजी मुख्यसचिव संजयकुमार यांनी निर्गमित केले आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web