एमआयडीसीतर्फे धारावीत धान्याचे वाटप

प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायम सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज धारावी परिसरातील गरजू नागरिकांना दोन लाख किलो धान्याचे वाटप  करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महापे येथील एमआयडीसी कार्यालयातून अन्नधान्याने भरलेल्या ट्रक रवाना करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अन्बलगन उपस्थित होते.

मुंबईतील धारावी परिसराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या परिस्थितीत येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एमआयडीसीने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबविला. धारावी येथील कामराज ज्युनियर कॉलेजमधून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी  धान्य, तांदूळ, आटा, तेल तूरडाळ, रवा, मसाला मीठ, साबण आदींचे वाटप करण्यात आले. एकूण दोन लाख किलो धान्याचे आज वाटप करण्यात आले. सुमारे दहा हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता मारुती कलकुटकी, एमआयडीसीचे सहायक अभियंता राजेश मुळे व प्रशांत चौधरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मिशेल झेवियर आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांना सामाजिक अंतराचे महत्त्व विशद करण्यात आले. या उपक्रमास धारावी येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनीही मदतीचा हात दिला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web