यवतमाळ जिल्हाधिका-यांनी घेतली मान्सुनपूर्व आढावा बैठक

प्रतिनिधी .

यवतमाळ – मान्सुनच्या काळात जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी, पूर परिस्थिती, अचानक येणारी आपत्ती आदी बाबींबाबत विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मान्सुनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हाधिका-यांनी विविध विभागाचा मान्सुनपूर्व प्रगतीचा आढावा घेतला.
नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले, तालुका स्तरावरील समितीने त्वरीत मान्सुनपूर्व बैठकीचे आयोजन करावे. तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे मानक कार्यपध्दतीनुसार (एसओपी) त्याची अंमलबजावणी करावी. सर्व नगर पालिका व ग्रामीण भागातील छोटे-मोठे नाले, वसाहतींमधील नाल्या स्वच्छ कराव्यात. विद्युत खांब, ट्रान्सफार्मरवर जी झाडे किंवा फांद्या येतात, त्या त्वरीत तोडाव्यात. जेणेकरून वीज पुरवठा खंडीत होणार नाही. सोबतच ग्रामीण व शहरी भागात ज्या रस्त्यांवर आवश्यकता आहे तेथे मुरूम टाकावा. आरोग्य विभागाने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी, आदी सुचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या तयारीचा आढावा घेतला.
जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार म्हणाले, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यावर्षी मान्सुन चांगला आहे. ही नक्कीच समाधानाची बाब आहे. मात्र अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीच्या दृष्टीने सर्वांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. विविध ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने कोणाचीही जीवितहाणी होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने असे खड्डे त्वरीत बुजवावे. किंवा प्रगतीपथावर असलेली खड्ड्यांची कामे त्वरीत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी सादरीकरण केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान आता 926.80 मिमी. एवढे झाले आहे. यापूर्वी ते 911.34 मिमी होते. जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पुरामुळे बाधित होणा-या गावांची संख्या जवळपास दीडशेच्या आसपास आहे. तसेच मोठ्या नद्यांच्या पुरामुळे विविध तालुक्यातील 21 गावे बाधित होतात. जिल्ह्यात नदी काठावरील 10 तालुक्यातील 24 गावे अतिसंवेदनशील असून 132 गावे संवेदनशील आहे. यासर्व गावात मान्सून काळात खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकांत देशपांडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रामटेके यांच्यासह सिंचन व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web