खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी .

ठाणे – खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, जास्त दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातखरीप हंगामाच्या पिकांचे नियोजन, बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदी बाबींच्या पूर्वतयारीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली.यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री श्री.शिंदे म्हणाले,ठाणे जिल्हयात ६५हजार ९०९हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, नगली,तृण धान्य, कडधान्य, गळीत धान्य क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी ११हजार ५०० क्विंटल बियाणांची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते कृषि निवीष्ठा उपलब्ध करुन देण्यासोबतच यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका. कृषि निवीष्ठाबाबत लक्ष ठेवणे आवश्यक असून यामध्ये जादा दराने विक्री होणार नाही तसेच याबाबत शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचनाही श्री.शिंदे यांनी दिल्या. शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता दर्जेदार असावी असे सांगून श्री.शिंदे म्हणाले, कृषि विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. खत मागणी व पुरवठा, कृषि निविष्ठा विक्रेत्यांची संख्या, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांसाठी नमुन्याचे नियोजन या विषयांवर चर्चा झाली. जिल्हा खरीप हंगाम 2020 च्या नियोजनाबरोबर पतपुरवठा वेळेवर होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वेळेवर करा. आतपर्यत ५ कोटी चे वाटप झाले आहे. उर्वरीत वाटप लवकर करावे अशा सुचना संबंधितांना दिल्या. तसेच
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे अशा सुचनाही श्री शिंदे यांनी बँकांना दिल्या. कोरोनामुळे शेतकरी संकटांत आहे. त्यांना सर्व सुविधा तात्काळ बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व नियोजन काटेकोरपणे करावे असेही श्री शिंदे यांनी सांगितले. कृषी अधिक्षक श्री माने यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web