कल्याण– महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधिल तरतूदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे, त्याअनुषंगाने नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. २०/०३/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील ” जीवनावश्यक वस्तू, बेकरी , दुग्धजन्य दुकाने (डेअरी), किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रुग्णालय / क्लिनीक, भाजीपाला इ. खादय पदार्थ आस्थापना” सोडून अन्य व्यावसायिक आस्थापना/ दुकाने दि.३१/०३/२०२० पर्यंत बंद ठेवणेबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. सदर आदेशाचे उल्ंघन करणारे संबंधित व्यावसायिक आस्थापना/दुकाने यांचे मालक भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय /कायदेशिर कारवाईस पात्र असतील असेही सदर आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूवर प्रतिबंधक उपाय म्हणून शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंञित करणेकामी शासन निर्णयानुसार महापालिका कार्यालयातही रोटेशन नुसार कर्मचारी(५० टक्के) उपस्थित ठेवणेबाबत, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सूचना दिलेल्या आहेत.
महापालिका क्षेञातील रिक्षा चालकांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून रूमालाचा किंवा मास्कचा वापर करावा आणि शक्यतोवर सॅनिटायझर जवळ बाळगावेत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.